[ad_1]
उत्तर भारतात निवडणुकांच्या तोंडावर दोन धर्मीयांत ताणतणाव होऊ लागतात त्याप्रमाणे पंजाबात निवडणुकांच्या तोंडावर हे असे धर्मग्रंथाच्या अपमानाचे प्रकार घडतात…
अवमान करावा असे वाटणे हेच मुळात सडक्या मनोवृत्तीचे लक्षण. पण त्या अवमानाचा आधार पुढचे राजकारण तापवण्यासाठी लागावा हे आपल्या विसविशीत सामाजिकतेचे चिन्ह…
पंजाबमध्ये गुरू ग्रंथसाहिबचा अपमान केला म्हणून दोन तरुणांची जमावाने हत्या केली ही घटना सुन्न करणारी आहे. या हत्येपेक्षाही सुन्न करणारी आहे ती या मुद्द्यावरची सर्वपक्षीय राजकीय शांतता. सर्व संबंधितांत अहमहमिका सुरू आहे ती धर्मग्रंथाचा कसा अक्षम्य अवमान झाला हे सांगण्याविषयी. ही घटना निंदनीय खरीच. पण म्हणून तसा अपमान करणाऱ्यास अशा झुंडन्यायाद्वारे आदिम पद्धतीने संपवून टाकले जावे आणि याविषयी समाजधुरीणांस काहीच वाटू नये हे भयंकर आहे. शीख धर्मात गुरू ग्रंथसाहिब या ग्रंथास ‘जिवंत’ गुरू मानले जाते. त्यामुळे खऱ्या सदेह गुरूंचाही दरबार ज्याप्रमाणे भरला असता त्याप्रमाणे गुरू ग्रंथसाहिबचा दरबार असतो. त्या ग्रंथास चवरीने वारा घालणे वगैरे होत असते ते त्यामुळे. म्हणून या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान हा प्रत्यक्ष जिवंत गुरूचा अपमान असे मानले जाते आणि त्यामुळे अपमानकत्र्यास ‘शासन’ केले जाते. आधुनिक समाजात या अशा शासनासाठी लोकनियुक्त आणि कायद्याद्वारे स्थापित शासन असते. पण या शासनाकडून आपणास न्याय मिळत नाही अशी संबंधित धर्मीयांची तक्रार. म्हणून मग हा झटपट न्यायाचा स्वघोषित मार्ग. गेल्या आठवड्याभरात या अशा झुंडन्यायिक व्यवस्थेत दोघांस जमावाने ठार मारले. त्यानंतर उठलेल्या प्रतिक्रियांत धर्मग्रंथाच्या अपमानाची निंदा झाली. ती रास्त. पण म्हणून अशा पद्धतीने कायदा हाती घेऊन झुंडन्यायव्यवस्थेत दोघांचे प्राण जावेत याविषयी कोणालाच काही वाटू नये हे समाज म्हणून आपली शून्य प्रगती दाखवून देणारे आहे.
असे म्हणण्यास कारण की, गेल्या काही वर्षांत एकट्या पंजाबात अशा धर्मापमानाच्या जवळपास २०० घटना घडल्या आणि यंदाच्या एकाच वर्षात अशा घटनांत सहा जणांनी प्राण गमावले. सिंघू सीमेवर तर शिखांतील कर्मठ पंथीयांनी एकाचे हात तोडून त्या हिंसेचे प्रदर्शन केले होते. पंजाबात राज्य विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. उत्तर भारतात ज्याप्रमाणे निवडणुकांच्या तोंडावर हिंदू आणि मुसलमान यांच्यात ताणतणाव होऊ लागतात त्याचप्रमाणे पंजाबात निवडणुकांच्या तोंडावर हे असे धर्मग्रंथाच्या अपमानाचे प्रकार घडतात. याबाबत लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकांत धर्मग्रंथाचा अपमान आणि त्याबाबत सरकारी निष्क्रियता हा मुद्दा होता. त्या वेळी अकाली दल- भाजप युतीने तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांना या विषयावर लक्ष्य केले होते. परिणामी आपण पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास या धर्मापमान करणाऱ्यांचा कसा बीमोड करू याची वीरश्रीयुक्त आश्वासने अमरिंदर यांनी दिली होती. तथापि या मुद्द्यांचे आयुष्य निवडणूक हंगामापुरतेच असते या सत्याची जाणीव असल्याने अमरिंदर यांनी त्याबाबत काहीही केले नाही. पण काँग्रेस पक्षात जेव्हा दुफळी निर्माण झाली तेव्हा त्या पक्षाचे बडबडे बंडखोर नवज्योतसिंग सिद्धू यांनी या मुद्द्यावर अमरिंदर यांना जेरीस आणले. अखेर अमरिंदर यांस जावे लागले. आता ते भाजपच्या अंगणात आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर आता भाजपचीही अडचणच. हा मुद्दा ताणायचा तर त्यावर निष्क्रिय असलेले अमरिंदर यांस जवळ केलेले. आणि त्याकडे दुर्लक्ष करावे तर मुद्दा हातचा जातो.
यात आता मुख्य लक्ष असेल तर मुख्यमंत्री चैनी हा विषय कसा हाताळतात याकडे. याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची पाश्र्वभूमी. ते दलित समाजातील आहेत आणि अशा धर्मापमानात मारले गेलेले वा दोषी असलेलेही दलित आहेत. यामागे आहे पंजाबातील दलित शीख आणि जाट शीख यांच्यातील सुप्त संघर्ष. पण हे केवळ जातीचेच राजकारण नाही. त्यास मोठी आर्थिक किनार आहे. ती अशी की पंजाबी शिखांमध्ये साधारण ३० टक्के इतके प्रमाण दलित शिखांचे आहे. पण त्यांच्या हाती राज्यातील एक टक्का इतकीही सुपीक जमीन नाही. तीवर एकहाती कब्जा आहे तो जाट शिखांचा. हे जाट शीख राजकीयदृष्ट्याही चांगलेच तगडे आहेत. किती ते साक्षात नरेंद्र मोदी यांस शरणागत करण्याच्या त्यांच्या क्षमतेतून दिसते. या संघर्षांची तिसरी बाजू म्हणजे विविध बाबांचे मठ. उदाहरणार्थ डेरा सच्चा सौदा वा वादग्रस्त, फिल्मी नामधारी बाबा रामरहीम. हे बाबा वा त्यांचे डेरे यांत बहुसंख्य जाटेतर आहेत. त्यामुळे अभिजनवादी धर्ममार्तंड आणि हे नवधर्मी यांच्यात एक वेगळाच संघर्ष. त्याचा फायदा उठवू पाहणाऱ्या पाकिस्तानी आयएसआयसारख्या संघटना आणि त्यांनी हाताशी धरलेले खलिस्तानवादी घटक हे या सर्व सामाजिक ताणतणावामुळे निर्माण होणारे खरे धोके. पंजाबने ते वारंवार अनुभवलेले आहेत. आताही या घटनांमागे अन्य देशीय हितसंबंधी नसतील असे छातीठोकपणे सांगणे अवघड. हे धर्माच्या अंगाने जाणारे सामाजिक ताणतणावांचे वास्तव आणि त्यात होऊ घातलेल्या निवडणुका ही अस्थिरता निर्माण करण्यासाठी अत्यंत आदर्श परिस्थिती.
म्हणून अशा वेळी या अशा घटना आणि त्यावरील झुंडप्रतिक्रिया टाळायला हव्यात. तेवढा विवेक पंजाबसारख्या संवेदनशील आणि सीमावर्ती राज्यांतील नेतृत्वाने आता तरी दाखवायला हवा. आता तरी असे म्हणायचे याचे कारण भिंद्रनवाले आणि त्या खलिस्तानवादी आंदोलनाच्या जखमा अद्यापही भरून आलेल्या नाहीत. स्थानिक राजकारणातल्या कुरघोडीच्या प्रयत्नांची आडपैदास म्हणजे फुटीरतावादी खलिस्तान चळवळ. त्या वेळी त्या दुफळीमागे काँग्रेसमधील प्रतापसिंग कैराँ, अन्य नेते आणि इंदिरा गांधी यांच्यातील संघर्ष हे कारण होते. तेव्हा त्या राज्यात भाजप वा जनसंघ नगण्य होता आणि आताही भाजपचे अस्तित्व नसल्यात जमा आहे. पण ते निर्माण करण्यासाठी धर्माचा निरर्गल आधार घेण्याच्या भाजपच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. म्हणजे तर पंजाबातील स्थानिकांनी तर या मुद्द्यावर अधिक सावधानता बाळगायला हवी. अर्थात अशी धोरणात्मक सावधानता शिखांच्या स्थायिभावात मोडत नाही हे सत्य आहेच. म्हणून सदैव भावनोद्दीपिततेस सज्ज अशा या समाजात असे प्रसंग वारंवार घडतात आणि निवडणुका आल्या की त्यात वाढ होते. हे दुर्दैवी आहे.
तथापि या निमित्ताने एका व्यापक मुद्द्याचा विचार महासत्ता होऊ पाहणाऱ्या या देशाने करावयाची वेळ आली आहे. तो मुद्दा म्हणजे आणखी किती काळ आपण पुराणातील वानगींच्या आधारे जगणार? पंजाबातील ताजे प्रकार यात मोडत नाहीत हे खरे. पण पंजाबात हे असे होत असताना दक्षिणेतील कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना हा मुद्दा तापावा यात योगायोग नाही. पंजाबप्रमाणे ते राज्यही लवकरच निवडणुकीस सामोरे जाईल. तेव्हा त्या राज्यातील भावनिक मुद्द्यामागेही निवडणुका हे कारण नाही, असे म्हणता येणार नाही. छत्रपतींचा अवमान करावा असे वाटणे हेच मुळात सडक्या मनोवृत्तीचे लक्षण. पण त्या अवमानाचा आधार पुढचे राजकारण तापवण्यासाठी लागावा हे आपल्या विसविशीत सामाजिकतेचे चिन्ह. वर्तमानात काही लक्ष्य नसलेला आणि म्हणून भविष्याकडून काही आशाअपेक्षा नसलेला निराशावादी समाज हा इतिहासात आपल्या जगण्याचे प्रयोजन शोधू लागतो. आपले असे तर होत नाही ना, हा प्रश्न विचार करण्याची क्षमता असणाऱ्यांनी तरी विचारायला हवा. कारण असा आणि इतका इतिहासजीवी समाज उत्कट, भव्य भविष्य घडवू शकत नाही.
The post इतिहासजीवी! appeared first on Loksatta.
[ad_2]
Source link